जालन्यातील मराठा आंदोलन चिघळलंय, मराठा कार्यकर्ते आक्रमक

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. मराठा संघटनेने उद्या बीड बंदचं आव्हान केलं आहे. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिले आहेत.

वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,मुंबई:जालन्यातलं मराठा आंदोलन चिघळलंय. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज  केला. अंतरावली सराटी इथं हा प्रकार घडलाय. मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी इथं आंदोलन सुरू होतं. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे काही सहकाऱ्यांसह उपोषनास बसले होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाल्या होत्या पण पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलनावेळी पोलिसांनी हा लाठीचार्ज केला. यात काही आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले आहेत.

मराठा आंदोलन आक्रमक
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यामुळे संतप्त आंदोलकांनी गाड्यांची जाळपोळ केलीय. लाठीचार्ज घटनेचा निषेध म्हणून मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ केली आहे. घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाच्या विषयावर तज्ज्ञांशी चर्चा झाली असून त्यावर कार्यवाही सुरु आहे. फण झालेला प्रकार दुर्देवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी म्हटलंय. तर जालन्यातील लाठीचार्जप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे आदेश दिले आहेत. जालन्यातल्या अंतरावली सराटी इथं मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यानंतर याठिकाणी तणावाचं वातावरण आहे.  लाठीचार्जचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

विरोधकांचा सरकारवर निशाणा
इतका मोठा लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभल्यापासून गेल्या वर्षभरात कायदा-सुव्यवस्था, लोकांची सुरक्षा यावर सतत हल्ले होत आहे. शिवसेना या घटनेचा निषेध करते असं राऊत यांनी म्हटलंय. मोदींच्या राज्यात आणि महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्यात मोर्चे, आंदोलनं ही हत्यारं जे वापरतील त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून हल्ले करायचे अशा प्रकारचं धोरण दिसंतय. या रक्तचा प्रत्येक थेंब हा वणव्यासारखा पेटल्याशिवाय राहाणार नाही असं राऊत यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. तुमचं  वैफल्य तुम्ही जनतेवर काढू नका अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर हवेत गोळीबार करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय… लाठीचार्ज करणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करण्याची मागणीही वडेट्टीवारांनी केलीय… तसंच लाठीचार्ज करणारं निर्दयी सरकार असल्याचीही टीकाही वडेट्टीवारांनी केलीय. जालन्यात एवढा राडा झाला तेव्हा गृहमंत्रालय झोपलं होतं का, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *